दिवाळीत झालेल्या गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला, पुण्यातील गर्दीवर अजित पवारांचा खोचक टोला

| Updated on: Nov 22, 2020 | 5:13 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग आणि होणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर लोकं मेल्यावर लस येईल का? असा उद्विग्न सवाल केला आहे.

दिवाळीत झालेल्या गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला, पुण्यातील गर्दीवर अजित पवारांचा खोचक टोला
Follow us on

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग आणि होणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर लोकं मेल्यावर लस येईल का? असा उद्विग्न सवाल केला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. तसेच सध्या सरकारची तारेवरची कसरत सुरु असल्याचं सांगितलं (Ajit Pawar comment on Corona Vaccine and Crowd in Pune amid Diwali).

अजित पवार म्हणाले, “सध्या आम्हीही तारेवरची कसरत करतोय. पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. कोरोनाच्या संकटामुळं विकासकामं थांबलीत. शेवटी सगळी सोंग करता येतात मात्र पैश्यांचे सोंग करता येत नाही. कोरोना लस लोक मेल्यावर येईल का?”

यावेळी अजित पवार यांनी दिवाळीच्या काळात पुण्यातील बाजीराव रोड आणि लक्ष्मी रोड परिसरातील गर्दीवरुन पुणेकरांना चांगलेच टोले लगावले. दिवाळीत झालेल्या गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला, असं खोचक टोला पवारांनी लगावला. अजित पवारांचा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जारी केलेल्या सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर नाराजी व्यक्त केली. तसेच नागरिकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन केलं.

“काँग्रेस आणि शिवसेनेला विश्वासात घेतलं पाहिजे. राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काही उमेदवार शरद पवारांचा, उद्धव ठाकरेंचा आणि माझा फोटो लावत आहेत. मात्र, ते उमेदवार आमचे नाहीत.”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “काही लोकं काहीही बरळायला लागली आहेत. विशेष करुन विरोधी पक्षनेते खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत. त्यांना हे कितपत शोभतंय, त्यांना समाजात किती किंमत आहे? पवार साहेबांनी एखाद्या व्यक्तीला केंद्रित करून राजकारण केलं नाही. त्यांनी नेहमी समाजासाठी काम केलं. विरोधी पक्षातील नेते स्वतःचा तोल गेल्यासारखं वक्तव्य करतायत. त्यांना जास्त किंमत देण्याची गरज नाही.”

यंदा धरणं भरलेली असल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची गरज भासणार नाही, असंही अजित पवार यांनी नमूद केलं. एकदा कोरोना झाला म्हणून काळजी घ्यायची नाही असं नाही. काळजी घेतली नाही तर पुन्हा कोरोना होऊ शकतो, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणेकरांनो काळजी घ्या, अजित पवार यांचं आवाहन

BREAKING | कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

संयुक्त महाराष्ट्रच्या वक्तव्यावरुन संताप, कन्नडिगांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुतळा जाळला

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar comment on Corona Vaccine and Crowd in Pune amid Diwali