Indian Railway : काय सांगता, मुंगीच्या वेगाने धावणारी ट्रेन! भारताची सर्वात स्लो रेल्वे, 5 तासांत कापते एवढे अंतर

| Updated on: Jan 15, 2023 | 5:50 PM

Indian Railway : ही भारतातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन आहे. मुंगीच्या वेगाने धावणारी ही ट्रेन आहे तरी कुठे?

Indian Railway : काय सांगता, मुंगीच्या वेगाने धावणारी ट्रेन! भारताची सर्वात स्लो रेल्वे, 5 तासांत कापते एवढे अंतर
Follow us on

नवी दिल्ली : जमाना वेगाचा आहे. वेगाने आणि झटपट काम करण्याची सर्वांनाच सवय झाली आहे. जो तो कायदा पाळा गतीचा म्हणून सारखा धावतोय. भारतीय रेल्वेनेही (Indian Railway) कात टाकली आहे. भारतातही आता इलेक्ट्रिक रेल्वे, हायस्पीड रेल्वे (High Speed Railway) आणि सुपर एक्सप्रेस रेल्वे आणि आता वंदे भारत सारख्या अति वेगवान रेल्वे ट्रॅकवर सूसाट धावत आहेत. अशा या स्पर्धेच्या युगात एका भारतीय ट्रेनने मात्र तिचं वेगळपण जपलं आहे. ही ट्रेन भारतातील सर्वात स्लो ट्रेन (Slow Train) आहे. तामिळनाडू राज्यातील ही ट्रेन भारतातील सर्वात कमी वेगानं धावणारी रेल्वे ठरली आहे.

या रेल्वेचा प्रवास एक वेगळा अनुभव आहे. ही अत्यंत कमी वेगानं धावणारी रेल्वे असल्याने अंतर कापायला या रेल्वेला खूप वेळ लागतो. पण या ट्रेनची मजा काही औरच आहे. यातून सफर करताना तुम्ही अगदी हरकून जाता.

मेट्टुपलयम ऊटी निलगिरी पॅसेंजर ट्रेन (Mettupalayam Ooty Nilgiri Passenger Train) असे या ट्रेनचं नाव आहे. ही भारतातील सर्वात कमी वेगानं धावणारी रेल्वे आहे. एका तासाला ही रेल्वे अवघे 10 किमीचे अंतर कापते. भारतातील सर्वात वेगाने धावणाऱ्या रेल्वेपेक्षा ही 16 पट स्लो आहे.

हे सुद्धा वाचा

ही पॅसेजर पाच तासांत केवळ 46 किमी धावते. डोंगरी भागातून ही रेल्वे धावत असल्यानेच तिचा वेग अत्यंत कमी आहे. दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा विस्तार म्हणून या ट्रेनला संयुक्त राष्ट्र संघ युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे.

युनोस्कोच्या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, नीलगिरी माऊंटेन रेल्वे पहिल्यांदा 1854 प्रस्तावित करण्यात आली होती. डोंगराळ प्रदेशामुळे रेल्वेची वाट अत्यंत बिकट झाली. 1891 मध्ये कामाला सुरुवात झाली. 1908 मध्ये हे काम पूर्ण झाले.

युनोस्कोच्या माहितीनुसार, डोंगराळ प्रदेशामुळे या भागात रेल्वे रुळ टाकणे अवघड होते. पण हे काम पूर्ण झाले. रेल्वे 326 मीटर हून 2203 मीटरपर्यंत चढणीचा मार्ग धरते. त्यामुळे या रेल्वेचा वेग अत्यंत कमी आहे. पण त्यामुळे निसर्ग संपन्नता भरभरुन याची देहि याची डोळा पाहता येते.

IRCTC च्या मते, ही ट्रेन 46 किलोमीटरचा प्रवास करते. यादरम्यान अनेक बोगदे आणि 100 पूल ओलांडून जाते. प्रवासादरम्यान डोंगराळ भाग, चहाचे मळे आणि घनदाट जंगल आणि डोंगरातून ट्रेन प्रवास करते. त्यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरतो.

मेट्टुपलायम ते कुन्नूरपर्यंत ही रेल्वे धावते. निलगिरी माउंटन रेल्वे मेट्टुपालयम ते उटी दरम्यान दररोज धावते. ही रेल्वे सकाळी 7.10 वाजता मेट्टुपलायम येथून प्रवासाला सुरुवात करते आणि दुपारी 12 वाजता ऊटीला पोहचते.

त्यानंतर पुन्हा उलटा प्रवास करत ही रेल्वे संध्याकाळी 5.35 वाजता मेट्टुपलायम येथे पोहचते. कुन्नूर, वेलिंग्टन, अरवंकडू, केट्टी आणि लवडेल हे या रेल्वेचे प्रमुख स्टेशन आहेत. या रेल्वेत प्रथम आणि द्वितीय श्रेणीचे दोन सीट आहेत.