एसी लोकलने प्रवाशांचे अपघात घटले की वाढले? काय सांगते आकडेवारी?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकल ट्रेनने दररोज 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. लोकलची गर्दी इतकी वाढत आहे. दररोज सरासरी 10 प्रवाशांचा हकनाक बळी जायचा. आता हा आकडा दरदिवशी आठ प्रवासी इतका आहे. एसी लोकलचे दरवाजे बंद असल्याने प्रवाशांचे मृत्यू होणार नसल्याचे म्हटले जाते होते. हळूहळू एसी लोकलची संख्या वाढत आहे. परंतू ती फायद्याची आहे काय? नेमकी काय आहे परिस्थिती पाहूयात....

एसी लोकलने प्रवाशांचे अपघात घटले की वाढले? काय सांगते आकडेवारी?
mumbai ac local Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 5:36 PM

मुंबईत लोकलच्या रोजच्या धकाधकीच्या प्रवासात लोकलमधून पडून किंवा रुळ ओलांडताना दररोज सरासरी दहा प्रवाशांचा बळी जायचा. हा आकडा सध्या दररोज सरासरी आठ प्रवाशांचा मृत्यू असा कमी आला असला तरी धक्कादायकच आहे. एकीकडे जपानची शिंकानसेन बुलेट ट्रेन 1964 पासून एकाही प्रवाशाचा अपघाती मृत्यू नसल्याचा दाखला देत मिरवित असताना मुंबईत रोज होत असलेला आठ ते दहा प्रवाशांचा मृत्यू ही गोष्ट लाजीरवाणी ठरली आहे. या लोकल प्रवासातील मृत्यूंची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेत ‘बंद दरवाजा’च्या लोकल चालविण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रवाशांसाठी सुरक्षित अशा एसी लोकल आल्या खऱ्या, परंतू त्यांचे भाडे जादा असल्याने सर्वसामान्यांच्या त्या आवाक्या बाहेरच्या ठरल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी एसी लोकलच्या एकेरी तिकीटाचे भाडे पन्नास टक्के कमी केले. त्यामुळे ओला-उबरने प्रवास करणारा वर्ग एसी लोकलला मिळाला. परंतू सर्वसामान्य प्रवासी एसी लोकलला नाक मुरडतच आहेत. एसी लोकलच्या फेऱ्या वाढविल्यास सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी होत असल्याने प्रवाशांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांचे काय मत आहे पाहूयात ?

मुंबई उपनगरीय लोकलने दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करीत असतात. पूर्वी लोकलचा प्रवास करताना दररोज सरासरी दहा प्रवाशांचा मृत्यू व्हायचा, आता ही संख्या दररोज सरासरी आठ जणांच्या मृत्यूपर्यंत कमी झाली आहे. या रेल्वेच्या ‘मिशन झिरो डेथ’ अंतर्गत केलेल्या उपाय योजनांमुळे मृत्यू जरी कमी होत असले तरी अजूनही रेल्वे रुळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू होत आहेत. गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर 2023 या काळात एकूण 2,590 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यात रेल्वेचे रुळ ओलांडताना सर्वाधिक 1,277 जणांचा मृत्यू झाला आहे. तर लोकलमधून पडून 590 प्रवाशांचा गेल्यावर्षभरात मृत्यू झाला आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासातील मृत्यू रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे माहीती अधिकार कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी प्रवाशांचे मृत्यू रोखण्यासाठी बंद दरवाजाच्या लोकल चालविण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुंबईत एसी लोकल सुरु झाल्या. परंतू या एसी लोकलचे तिकीट प्रचंड महाग ठेवल्याने प्रवाशांची आणखीनच अडचण झाली आहे. जसजशा एसी लोकलच्या फेऱ्या वाढत आहेत तसतशी साध्या लोकलची संख्या कमी झाल्याने साध्या लोकलमधील गर्दी वाढतच चालली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मृत्यू रोखण्यासाठी फर्स्ट क्लासच्या डब्यांचे परिवर्तन एसी डब्यात करण्याची मागणी समीर झव्हेरी यांनी केली आहे.

गेल्यावर्षभरातील लोकलचे बळी

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 मध्ये उपनगरीय लोकलच्या तिन्ही मार्गांवर मिळून एकूण 2,590 जणांचा मृत्यू झाला तर जवळपास तेवढेच 2,441 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2,343 पुरुष तर 247 महिलांचा समावेश आहे. मध्य रेल्वेवर 1,650 जणांचा मृत्यू झाला ( 1,496 पुरुष आणि 154 महिला ) आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर 950 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 847 पुरुष तर 93 महिलांचा समावेश आहे. गेल्यावर्षी लोकल प्रवासात मृत्यू झालेल्या 2,590 जणांपैकी रेल्वेचे रुळ ओलांडताना 1,277 जणांचा ( 1,168 पुरुष आणि 109 महिला ), धावत्या लोकलमधून पडून 590 जणांचा ( 535 पुरुष आणि 55 महिला ), तर पोलला धडकून 4 जणांचा, लोकल आणि फलाटाच्या गॅपमध्ये पडून 10 जणांचा, वीजेचा शॉक लागून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 121 जणांनी लोकलखाली आत्महत्या केली आहे. जर आजारपणामुळे 529 जणांचा लोकल प्रवासात नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तर इतर कारणांनी 32 जणांचा मृत्यू झाला असून 13 जणांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांअभावी प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेचा ठाण्यापलिकडील कर्जत ते कसाऱ्यापर्यंतचा लोकलचा प्रवास आणि पश्चिम रेल्वेचा अंधेरीनंतर विरार-डहाणूपर्यंतचा प्रवास प्रचंड गर्दीचा आणि धकाधकीचा बनला आहे. या डहाणू लोकलची संख्या अंत्यत मर्यादीत आहे. विरार ते डहाणू चौपदरीकरणाचे कामे अनेक वर्षे सुरु आहे. चौपदरीकरणानंतर लोकल फेऱ्यांची संख्या वाढणार असल्याचे म्हटले जाते. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ( एमयूटीपी ) – टप्पा क्रमांक 2 अंतर्गत मुंबई सेंट्रल ते बोरीवली पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम गेली अनेक वर्षे सुरु आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे गेली बरीच वर्षे जागेअभावी रखडले आहे. या पाचव्या आणि सहाव्या मार्गिका कार्यरत झाल्यानंतरच लांबपल्ल्यांच्या मेल-एक्सप्रेसना स्वतंत्र मार्गिका मिळून लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढविणे शक्य होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत 336 जणांचा मृत्यू

गेल्यावर्षी लोकल प्रवास करताना झालेल्या अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू मध्य रेल्वेच्या कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत 336 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर पश्चिम रेल्वेच्या हद्दीत बोरीवलीत सर्वाधिक 256 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू मध्य रेल्वेच्या ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत ( 179 मृत्यू ) घडले आहेत.

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलची संख्या

25 डिसेंबर 2017 मध्ये पश्चिम रेल्वेवर पहिली एसी लोकल चालविण्यात आली होती. त्यानंतर आजच्या घडीला पश्चिम रेल्वेवर दररोज एकूण 1,394 लोकल चालविण्यात येत असून त्यातील एसी लोकलची संख्या 96 इतकी आहे. पश्चिम रेल्वेवर पंधरा डब्याच्या एकूण 199 लोकल चालविण्यात येत आहेत. त्यातील 24 पंधरा डब्यांच्या लोकलचा प्रवास चर्चगेट येथून सुरु होतो आणि संपतो. तर 26 पंधरा डबा लोकल दादर येथून सुरु होतात. तर उर्वरित पंधरा डबा लोकल अंधेरी ते विरार दरम्यान चालविण्यात येतात.

मध्य रेल्वेवरील एसी लोकलची संख्या

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनवरील उपनगरीय मार्गावर सध्या दररोज 1,810 लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहेत. त्यात एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या 66 इतकी आहे. उपनगरीय मार्गावरील पहिल्या एसी लोकलच्या चाचण्या खरे तर मध्य रेल्वेच्या मार्गावर आधी झाल्या होत्या. परंतू प्रत्यक्षात एसी लोकल मात्र पश्चिम रेल्वेवर आधी धावली होती.

पश्चिम रेल्वेची ‘झिरो डेथ मोहीम’

पश्चिम रेल्वेने प्रवाशांनी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडू नये म्हणून ‘झिरो डेथ मिशन’ मोहीम राबविली होती. यात गेल्या वर्षी 13 फुटओव्हर ब्रिज, 18 सरकते जिने आणि 15 लिफ्ट सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण फूट ओव्हर ब्रिजची संख्या 146, सरकते जिन्यांची संख्या 104 आणि लिफ्टची संख्या 49 इतकी झाली आहे. फलाटांची उंची वाढविली आहे. रुळ ओलांडून नये म्हणून दोन रुळांमध्ये बॅरीकेट्स उभारण्यात आले आहे. तर संभाव्य अपघात स्थळांवर सावधानतेच्या सूचना लावण्यात आल्या आहेत.

फर्स्टक्लासच्या डब्यांचे एसी डब्यात रुपांतर करा

मुंबई उपनगरीय लोकल प्रवाशांच्या दररोजच्या धकाधकीच्या प्रवास आणि त्यामुळे वाढणारे बळींचे आकडे पाहून माहीती अधिकार कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेमुळे मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर 108 हेल्पलाईन एम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या. तसेच रेल्वे स्थानकांवर इमर्जन्सी मेडीकल रुम्स उघडण्यात आल्या. त्या जखमींना ‘गोल्डन अवर’ मध्ये मदत मिळणे शक्य झाले असून त्यामुळे त्यांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे समीर झव्हेरी यांनी म्हटले आहे. मुंबईत हायकोर्टाच्या आदेशानुसार बंद दरवाजाच्या एसी लोकल चालविणे शक्य झाले. परंतू या एसी लोकलचे तिकीट फर्स्ट क्लास तिकीटाच्या 1.3 पट महाग असल्याने त्यातून सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे एसी लोकलची संख्या जशी वाढेल तशी साध्या लोकलची संख्या कमी झाल्याने साध्या लोकलमधील गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे फर्स्टक्लासच्या डब्यांचे रुपांतर एसी डब्यात करण्यात यावे आणि उर्वरित डबे साधे ठेवावेत अशी मागणी समीर झव्हेरी यांनी केली आहे. त्यामुळे गर्दीचे विभाजन होईल. जर रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या मेल-एक्सप्रेसमध्ये एसीचे डबे स्वतंत्र असतात तर लोकलमध्ये स्वतंत्र एसीचे डबे रेल्वे का लावू शकत नाही ? असा सवाल आरटीआय कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी केला आहे.

सुपर डेन्स क्रश लोड

लोकलच्या प्रवासात दररोज सरासरी आठ प्रवाशांचा मृत्यू होतो. सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या पिकअवरमध्ये लोकलमध्ये मुंगी शिरायला देखील जागा नसते. मुंबईत गर्दीच्या वेळी एका लोकलमध्ये एका चौरस मीटर जागेत 16 प्रवासी दाटीवाटीने उभे असतात. यालाच ‘सुपर डेन्स क्रश लोड’ म्हटले जाते. गर्दीच्या वेळी एका लोकल ट्रेनमध्ये 1700 प्रवाशांच्या ऐवजी तब्बल पाच हजार प्रवासी प्रवास करीत असतात. पश्चिम रेल्वेवर दररोज 1,394 तर मध्य रेल्वेवर दररोज 1,810 लोकल फेऱ्या चालविल्या जातात, मध्य आणि पश्चिम असे दोन्ही मार्ग मिळून एकूण 3,204 लोकल फेऱ्या मुंबई उपनगरीय मार्गावर चालविल्या जातात. एका लोकलमध्ये 2000 प्रवासी गृहीत धरले तर तरी 3,204 लोकल फेऱ्या गुणिले सरासरी एका लोकल मागे 2500 प्रवासी असे 80 लाख 10 हजार प्रवासी दररोज लोकलने प्रवास करीत असतात असे म्हटले जाते.

रेल्वेचे अपघात घटले की वाढले ?

मुंबई उपनगरात साल 2023 मध्ये 2,590 जणांचा मृत्यू झाला तर साल 2022 मध्ये 2,507 जणांचा लोकल प्रवासात बळी गेला होता. 25 डिसेंबर 2017 मध्ये पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेवर धावली होती. साल 2017 मध्ये लोकल अपघातात 3,014 जणांचा बळी गेला होता. कोरोना काळात काही काळ वाहतूक बंद होती. त्यानंतर पुन्हा लोकल सुरु झाल्यानंतर लोकल प्रवासी घटले. त्यामुळे अपघातही थोडे घटले असावे असे म्हटले जात आहे. सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या मोजक्या फेऱ्या सुरु आहेत. त्यामुळे एसी लोकलने अपघात घटले असे म्हणता येणार नाही. परंतू रेल्वेचे जनप्रबोधन आणि इतर उपाययोजना झाल्याने अपघात कमी झाले असावे असे म्हणण्यास वाव आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.