पुराचा फटका, 6 हजार लिटर पेट्रोलमध्ये पाणी शिरलं, बदलापुरात पेट्रोलपंपाचं प्रचंड नुकसान

| Updated on: Jul 23, 2021 | 9:18 PM

बदलापूर शहराला गुरुवारी (22 जुलै) उल्हास नदीच्या पुराचा मोठा तडाखा बसला. या पुरात बदलापूरच्या नायरा पेट्रोल पंपाला मोठा फटका बसला आहे.

पुराचा फटका, 6 हजार लिटर पेट्रोलमध्ये पाणी शिरलं, बदलापुरात पेट्रोलपंपाचं प्रचंड नुकसान
पुराचा फटका, 6 हजार लिटर पेट्रोलमध्ये पाणी शिरलं, बदलापुरात पेट्रोलपंपाचं प्रचंड नुकसान
Follow us on

बदलापूर (ठाणे) : बदलापूर शहराला गुरुवारी (22 जुलै) उल्हास नदीच्या पुराचा मोठा तडाखा बसला. या पुरात बदलापूरच्या नायरा पेट्रोल पंपाला मोठा फटका बसला आहे. या पंपावर तब्बल 6 फूट पाणी साचलं होतं. त्यामुळे पंपावरील भूमिगत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे पेट्रोल पंपाचं लाखोचं नुकसान झालं आहे.

बदलापूर शहरात शिरल्यानंतर सर्वात पहिला फटका पेट्रोलपंपाला

बदलापूरच्या उल्हास नदीच्या चौपाटीला लागूनच नायरा कंपनीचा नव्यानंच उभारण्यात आलेला पेट्रोलपंप आहे. गुरुवारी उल्हास नदीच्या पुराचं पाणी बदलापूर शहरात शिरल्यानंतर सर्वात पहिला फटका हा या नायरा पेट्रोलपंपाला बसला. या पंपावर पुरामुळे तब्बल 6 फूट पाणी जमा झालं होतं. या पंपाचे फोटो आणि व्हिडीओ काल दिवसभर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर आज सकाळी पाणी ओसरल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ने या पेट्रोलपंपावर जाऊन आढावा घेतला. यावेळी या पंपाचं पुरामुळे मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं.

पेट्रोलपंप पुन्हा कधी सुरु होणार?

पंपावरील भूमिगत टाक्यांमध्ये 6 हजार लिटर पेट्रोल होतं. तर अडीच हजार लिटर डिझेल होतं. या सगळ्यामध्ये पाणी जाऊन मोठं नुकसान झालं आहे. आता पेट्रोलपंप पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी किमान 8 ते 10 दिवस लागणार असल्याची माहिती पेट्रोल पंप व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली.

बदलापुरात जलशुद्धीकरण प्रकल्पातही पाणी शिरलं

बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बॅरेज जलशुद्धीकरण प्रकल्पात कालच्या (22 जुलै) पुरामुळे उल्हास नदीचं पाणी घुसलं. त्यामुळे या प्रकल्पातील फिल्टरेशन प्लॅन्ट अजूनही पाण्याखाली आहे. त्यामुळे पुराच्या संकटानंतर आता बदलापूरकरांवर ‘पाणी’संकट ओढवलं आहे. मुसळधार पावसामुळे गुरुवारी (22 जुलै) उल्हास नदीला पूर आला. या पुरात उल्हास नदीने 20.30 मीटरची पातळी गाठली होती. त्यामुळे बॅरेज धरणाच्या भिंतीवरून पाणी आत घुसण्यासाठी फक्त एक वीत अंतर शिल्लक होतं. मात्र तरीही बुधवारी मध्यरात्री खालच्या बाजूने जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी घुसलं. या पाण्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पातील तिन्ही प्रक्रिया केंद्रात गढूळ पाणी शिरलं आणि प्रकल्प ठप्प झाला.

हेही वाचा :

आधी उल्हास नदीला पूर, आता जलशुद्धीकरण प्रकल्प बंद, बदलापूरकरांवर ‘पाणी’ संकट