निसर्गाचा भयंकर प्रकोप, पाऊस आहे की गोळीबार? हा भयावह व्हिडीओ महाराष्ट्रातलाच?

| Updated on: Mar 18, 2023 | 9:15 PM

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांपुढील हे संकट आणखी गडदपणे स्पष्ट करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

निसर्गाचा भयंकर प्रकोप, पाऊस आहे की गोळीबार? हा भयावह व्हिडीओ महाराष्ट्रातलाच?
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण (Maharashtra Political Crisis) गेल्या काही दिवासांमध्ये विचित्र झाल्याचं शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनेतेने पाहिलं. पण महाराष्ट्रात निसर्ग इतका विक्षिप्त आणि विचित्र वागेल असं शेतकऱ्यांना (Farmers) स्वप्नातही वाटलं नव्हतं. महाराष्ट्रात शेतकरी मातीला आई म्हणतो आणि पावसाला देव मानतो. पण हा देवच आता रागावलाय की काय? अशी परिस्थिती आज राज्यातील अनेक भागांमध्ये बघायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं बघायला मिळत आहे.

हा अवकाळी पाऊस तर येतोच आहे पण सोबतीला गारपीटही घेऊन येतोय. त्यामुळे शेतातल्या गहू, हरभरा, मका, कांदा, द्रांक्षासह डाळींबाच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या आहेत. हा पाऊस येतोय आणि शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेतोय. विशेष म्हणजे या अवकाळी पाऊस आणि गारपिटाचा तर एक भयानक व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत गारपीट होताना दिसत आहे. पण ही गारपीट अतिशय भयंकर अशी दिसतेय. हातात मावेल अशा दगडाच्या आकाराचे बर्फाचे गोळे (गारा) शेतात कोसळत आहेत. संबंधित व्हिडीओतलं दृश्य आणि आवाज ऐकल्यानंतर शेतात गारा पडत आहेत की गोळीबार होतोय? असा भयंकर प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. संबंधित व्हिडीओ हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

हे सुद्धा वाचा

गोळीबारासारखी गारपीट नेमकी कुठे झाली? याबाबतची अधिकृत अशी योग्य माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण ही गारपीट हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील बाभळी गावात पडल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम्ही या गारपिट विषयी माहिती शोधत आहोत. अशी गारपीट नेमकी कुठे पडली याबाबतची माहिती समोर येईलच. पण राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ आणि हवालदिल झालाय.

विशेष म्हणजे सध्याच्या घडीला राज्यातील 18 लाख शासकीय कर्मचारी देखील संपावर गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामा कोण करणार? त्यांचं दु:ख कोण समजून घेणार? त्यांच्या मदतीचं काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा होत नाही तोपर्यंत त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळणं शक्य नाही.