IMD Weather Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसासह आणखी एक नवं संकट, सहा जिल्ह्यांना हाय अलर्ट

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पूर्व राजस्थान, पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

IMD Weather Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसासह आणखी एक नवं संकट, सहा जिल्ह्यांना हाय अलर्ट
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आणि विशेष करून विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने गारपीट सुरू आहे. आता येत्या 24 तासांत विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 04, 2025 | 4:46 PM

देशातील अनेक भागांमध्ये सध्या कडाक्याचं ऊन पडत आहे. तपमानात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे रस्ते सुनसान झाले आहेत. याचदरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागानं देशातील अनेक भागांमध्ये वादळी वारा आणि विजांसह अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला असून, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आयएमडीनं म्हटलं आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पूर्व राजस्थान, पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 50-60 किमी एवढा प्रचंड राहणार असल्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किम मध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 40-50 किमी प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आयएमडीकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि वि‍जांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात 40-50 किमी प्रति तास वेगानं वारे वाहन्याची शक्यता आहे.

दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रसह इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, सिक्कम आणि जम्मू -काश्मीरच्या देखील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र हवेत गारवा निर्माण होऊन उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.