महायुतीमध्ये मोठी धुसफूस, शिंदेंच्या आमदाराचा तटकरेंवर गंभीर आरोप, पालकमंत्रिपदामुळे राजकारण तापलं!

रायगडचे पालकमंत्रिपद आतापर्यंत सुनील तटकरेंनीच अडवून ठेवलं होतं, असा मोठा दावा देखील त्यांनी केला. "पालकमंत्रिपदाची कमिटमेंट तटकरेंनीच दिली होती का, असाही मला संशय येतो, असे विधान महेंद्र दळवी यांनी केले आहे.

महायुतीमध्ये मोठी धुसफूस, शिंदेंच्या आमदाराचा तटकरेंवर गंभीर आरोप, पालकमंत्रिपदामुळे राजकारण तापलं!
mahendra dalvi and sunil tatkare
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2026 | 9:00 PM

Raigad Guardian Minister : रायगड विधानपरिषदेची निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे निवडून आले आहेत. आता रायगडचे पालकमंत्रिपद हे शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना मिळणार, असा दावा केला जातोय. परंतु तटकरे यांच्या विधानानंतर याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तता आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तटकरेंचं वक्तव्य संशयास्पद असल्याचं ते म्हणाले. पालकमंत्रिपदाबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख टाळला. त्यामुळे या वक्तव्यामागे काही वेगळं राजकारण आहे का, असा संशय निर्माण होत असल्याचं दळवींनी म्हटलं.

मी स्वतः शिंदे साहेबांच्या आदेशानुसार…

कोकण विधानपरिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीसाठी सर्वांनी प्रयत्न केल्याचा दावा करत दळवी म्हणाले की, अनेक उमेदवारांना शेवटच्या क्षणी अर्ज मागे घ्यायला लावण्यात आलं. मी स्वतः शिंदे साहेबांच्या आदेशानुसार माझ्या कन्येचा उमेदवारी अर्ज आदल्या दिवशी मागे घेतला. पालकमंत्री पदाची ही पूर्वीची कमिटमेंट होती आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.

दळवी यांनी व्यक्त केला संशय

रायगडचे पालकमंत्रिपद आतापर्यंत सुनील तटकरेंनीच अडवून ठेवलं होतं, असा मोठा दावा देखील त्यांनी केला. “पालकमंत्रिपदाची कमिटमेंट तटकरेंनीच दिली होती का, असाही मला संशय येतो. अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी पालकमंत्रिपदाचा प्रश्न शाब्दिक पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न झाला का? असा सवालही दळवी यांनी उपस्थित केला. तसेच भरत गोगावले यांना दिलेला शब्द पाळला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असल्याचं महेंद्र दळवी यांनी म्हटलं.

सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

महायुती म्हणून आम्ही पुन्हा एकदा राज्यात तसेच रायगड जिल्ह्यात भक्कमपणे काम करण्याचे ठरवले आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही या विषयावर चर्चा करू. महायुती अधिक मजबुतीने काम कशी करेल, यासाठी माझ्या स्तरावर माझा प्रयत्न राहील, असे विधान तटकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा आधार घेत मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळण्याबाबत अनिश्चितता असल्याचा दावा केला जातोय.

Follow Us