पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उर्मिला मातोंडकर कोल्हापूर-सांगलीत
मराठमोळी अभिनेत्री आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवार राहिलेली उर्मिला मातोंडकर सांगली-कोल्हापूरला जाऊन पूरग्रस्तांना मदत करत आहे
मुंबई : कोल्हापूर-सांगलीतील महापुराचं पाणी (Kolhapur Sangli Flood) ओसरत असलं, तरी त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचा डोंगर कायम आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ येत आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईतून काँग्रेसची उमेदवार राहिलेली मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेली आहे. उर्मिलाने सांगली-कोल्हापूर गाठत पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे सरसावलेला एक हात हा जास्त महत्वाचा असतो! महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत! पूर पीडितांना कष्ट, त्रास, अपेष्टा यापासून स्वतंत्र करण्यासाठी हा स्वातंत्र्य दिन त्यांच्यासाठी समर्पित’ अशा भावना उर्मिलाने ट्विटरवरुन व्यक्त केल्या होत्या.
A beautiful morning becomes even better when it’s driven with the will to help people..on my way to #Sangli and #Kolhapur to be amongst the flood victims for relief work ?? #MaharashtraFloods #help pic.twitter.com/n5qcBRWvJ2
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) August 14, 2019
‘कोल्हापूर, सांगली, कोकण, गडचिरोलीमध्ये पुरामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. खरा तो प्रेमचि धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी शिकवण देणाऱ्या साने गुरुजींच्या महाराष्ट्रातील आपण मुलं आहोत. त्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आपण सर्वांनी पुढे सरसावायला पाहिजे’ असं आवाहन उर्मिलाने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन केलं.
प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा मदती साठी पुढे सरसावलेला एक हात हा जास्त महत्वाचा असतो! महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत! पूर पीडितांना कष्ट,त्रास,अपेष्टा ह्यांच्या पासून स्वतंत्र करण्यासाठी हा स्वातंत्र्य दिन त्यांच्यासाठी समर्पित pic.twitter.com/40I3Ld281Q
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) August 13, 2019
राज्य सरकारसह सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना, वैयक्तिक पातळीवरील अनेक गट आणि सर्वसामान्य नागरिकही पूरग्रस्तांना मदत करत आहेत. अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, रवी जाधव, कुशल बद्रिके, हार्दिक जोशी (राणादा), अभिजीत चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर यासारख्या मराठी कलाकारांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर यासारख्या बॉलिवूडमधील मराठमोळ्या कलाकारांसह अमिताभ बच्चन, अक्षय कुमार अशा मोजक्याच बॉलिवूड सेलिब्रिटींनी पूरग्रस्तांना मदत केली आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने सेलिब्रिटींचे कानही पिळले होते. तसंच मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.