अमित शाह मुंबईत, विजय वडेट्टीवार म्हणतात हुजरेगिरीची गरज नाही; का म्हणाले असं?
शिंदे गट आणि अजित पवार गटाला भाजपच्या कमळ चिन्हावरच निवडणूक लढावी लागेल, असं राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार म्हणाले होते. रोहित पवार यांच्या या विधानाचं समर्थन केलं. शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमळाचा आधार घ्यावाच लागेल, असं वडेट्टीवार म्हणाले.
गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 23 सप्टेंबर 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत आहेत. शाह आज मुंबईत लालबागचा राजा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरचा गणपती आणि आशिष शेलार यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे. शाह सपत्नीक मुंबईत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मंत्री सज्ज झाले आहेत. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. अमित शाह गणपतीच्या दर्शनासाठी येणार आहेत. केंद्रीय मंत्री आल्यावर सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहणे गरजेचं नाही. आता हुजरेगीरीची पद्धत सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून सरकारला फटकारलं. ओबीसी आरक्षणाबाबतची बैठक ही भाजपची बैठक वाटते. आम्हाला बैठकीला बोलावले नाही. यांना मार्ग काढायचा नाहीच. म्हणून यांना विरोधक नको आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.
कळू द्या त्यांना
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार अपात्रते संदर्भात ऑनलाईन सुनावणी ऑनलाइन करावी, सर्वोच्च न्यायालयातील अनेक सुनावणी ऑनलाइन होते. मग ही सुनावणी ऑनलाइन करायला काय हरकत आहे? काय होतंय कळू द्या लोकांना, असं वडेट्टीवार म्हणाले.
रस्त्यावर उतरायला लावू नका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मुस्लिम आरक्षणावर नुसत्या चर्चा काय करत आहात? काँग्रेसनेच मुस्लिम आरक्षणाची मागणी केली होती. आता यांनी ओठात एक आणि पोटात एक असं करू नये. त्यांना रस्त्यावर उतरायला लावू नये, असा इशाराच त्यांनी दिला.
पवारांनीच संभ्रम दूर करावा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अहमदाबादमध्ये जाऊन उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतली. त्यामुळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भेटीमुळे संभ्रम निर्माण होतोय. याबाबत शरद पवार यांनीच हा संभ्रम दूर करावा, असं आवाहन त्यांनी केलं.