“काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच राहणार, कारण…”, अमोल मिटकरींना विश्वास
लवकरच शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिवसेनेसाठी पुढचे काही दिवस महत्वाचे आहेत.कारण लवकरच शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादीचे, विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “काहीही झालं तरी धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच (Uddhav Thackeray) राहणार”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसंच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही भाष्य केलंय.
धनुष्यबाण या विषयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच अधिकार होता, आहे आणि राहील.जरी दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्या असतील आणि निकाल दिला नसेल. तरी आम्हाला वाटतं की उद्धव ठाकरेंकडे चिन्ह राहील. न्यायालय त्यावर निकाल देईल. मात्र शिवसेनेची एक आचारसंहिता आहे. त्यालाही महत्व आहे. त्यामुळे धनुष्यबाण ठाकरेंकडेच राहील, असं ते म्हणालेत.
शिंदे सरकारचे 100 दिवस पूर्ण झालेत. मी शेतकरी म्हणून याकडे पाहतो. 100 दिवसात रेकॉर्ड ब्रेक शेतकऱ्यांच्या बाजूने कोणता निर्णय झाला हे यांनी छातीवर हात ठेवून सांगा.अजूनही शेतकऱ्याला कोणतीही मदत मिळालेली नाही. आता 100 रुपयात धान्य देतायत. पण शेतकरी यात समाधानी नाही, असं मिटकरी म्हणालेत.
सरकारचे 100 दिवस वाया गेले आहेत. नवरात्र, दहीहंडी, गरबा या धार्मिकतेतच नागरिकांना गुंतवून ठेवतायत. पण इथले रोजगार का गेले? इथल्या शेतकऱ्याला मदत का मदत मिळाली नाही? त्यामुळे या सरकारच्या कार्यकाळावर शेतकरी नाखूश आहे. ज्या राज्यात शेतकरी नाखूश असेल किंवा उद्विग्न असेल तो राजा किंवा ते राज्य जास्त दिवस टिकत नसतं, असंही मिटकरी म्हणालेत.
उद्धव ठाकरेंच्या सभेला मुंबईतला मराठी माणूस जो बाळासाहेबांपासून सभा ऐकतोय तो होता. कोणी बाहेरून आणलेली लोकं नव्हती. काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक गेले असतील तरी आम्ही आहोतच सोबत. पण भाड्याने जमवलेल्या गर्दीपेक्षा महाराष्ट्रातली लोकं उद्धव ठाकरेंसोबत होती. तीच मुंबई महापालिकेत परिवर्तनाची नांदी ठरेल, असं म्हणत त्यांनी शिंदेगट आणि भाजपचे दावे फेटाळले आहेत.