Marathi Serials | ‘ती परत आलीये’ ते ‘सांग तू आहेस का?’पर्यंत, मराठी मालिकांना पडलंय हॉरर-सस्पेन्सचं स्वप्न!
सासू-सूना भांडण, कटकारस्थानं सोडून आता मालिका एका वेगळ्या प्रकारच्या कंटेंटकडे आपला मोर्चा वळवत आहेत. प्रेम-भांडण या पलीकडे आता मराठी मालिकांनी हॉरर आणि सस्पेन्स प्रकारातील कथानकांना सादर करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : सासू-सूना भांडण, कटकारस्थानं सोडून आता मालिका एका वेगळ्या प्रकारच्या कंटेंटकडे आपला मोर्चा वळवत आहेत. प्रेम-भांडण या पलीकडे आता मराठी मालिकांनी हॉरर आणि सस्पेन्स प्रकारातील कथानकांना सादर करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक मराठी मनोरंजन वाहिनीवर अशा प्रकारची एखादं-दुसरी मालिका ही दिसतेच. इतकंच नव्हे तर, आता प्रेक्षक देखील अशा प्रकारच्या मालिका अधिक पसंत करू लागले आहेत.
‘ती परत आलीये’ पासून ते ‘सांग तू आहेस ना?’पर्यंत, काहीसं हॉरर आणि सस्पेन्स कथानक असलेल्या या मालिका अधिक लोकप्रिय ठरत आहेत. यामुळेच आता अशा आणखी काही नव्या मालिका देखील येऊ घातल्या आहेत. चला तर, अशा प्रकारच्या मालिकांवर एक नजर टाकूया…
रात्रीस खेळ चाले
झी मराठीवरील कोकणाची पार्श्वभूमी असणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सुपरडुपर हिट ठरली. या मालिकेचं चक्क तिसरं पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. एका नाईक आडनावाच्या घराण्याची “रात्रीस खेळ चाले” ही कथा. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली. अतृप्त आत्म्यानी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको, इंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या स़कटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. त्याची ही एक रंजक कथा असणार आहे. नाईक घराण्याचं पाप…शाप… आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच ‘रात्रीस खेळ चाले 3’ असणार आहे.
ती परत आलीये
झी मराठी वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliye) या आगामी मालिकेची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे की, ती म्हणजे नक्की कोण आहे? तिची झलक नुकतीच झी मराठीवर मालिकेच्या नवीन प्रोमो मधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेते विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं कि, विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये काही हत्या घडत आहेत. त्यामुळे सावध राहा अशी चेतावणी देताना, ते दिसत आहेत. नक्की ही भानगड काय आहे? या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत? ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
सांग तू आहेस का?
स्टार प्रवाहची ‘सांग तू आहेस का’ ही मालिका देखील अशाच आशयाचे कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. खऱ्या प्रेमाचा शेवट कधीच होत नाही असे म्हणत, ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या निमित्ताने अशीच एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना अनुभवता येत आहे. या मालिकेत सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसतो आहे. वैभवी आणि वैभवी यातील हे कोडं प्रेक्षकांना खूप आवडलं आहे.
देवमाणूस
पैशाच्या मोहापायी अनेक निष्पापांचा जीव घेणाऱ्या एका तोतया डॉक्टरची ही कथा सांगणारी मालिका लोकांना चांगलीच आवडली. सध्या ही मालिका शेवटच्या टप्प्यात असून, टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल आहे. मालिकेत आता आणखी काही नवे खुलासे होणार आहेत. या सगळ्यादरम्यान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. मालिकेत मोठ्या ट्वीस्टसह डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग आता पोलिसांच्या तावडीत सापडणार असून, त्याला कडक शिक्षा देखील होणार आहे. एका नव्या प्रोमोमध्ये देवीसिंग आपले सगळे गुन्हे कबुल करताना दिसला आहे. त्यामुळे आता त्याने स्वतःहून गुन्हे मान्य केल्याने त्याला फाशीच्या सुळाकडे नेले जात आहे. अर्थात या बोगस डॉक्टरला आता फासावर चढवले जाणार आहे.
हेही वाचा :
‘कैसे हो देवी और सज्जनो…’ पुन्हा एकदा कानी पडणार, ‘या’ दिवशी KBC प्रेक्षकांच्या भेटीला येणार!