मुंबई : सरकार स्थापनेवेळी महाविकास आघाडीला आपलं उघड समर्थन देणारे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी आता राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) सावध भूमिका घेतली आहे. राज्यसभेत महाविकास आघाडीला मतदान देणार की भाजपला असे विचारले असता, माझा निर्णय 10 तारखेलाच असे ठाकूर अनेक दिवसांपासून म्हणत आहेत. त्यामुळे आघाडी आणि भाजप नेत्यांकडून ठाकूर यांच्या नधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकूश काकडे यांच्या मोबाईलवरून ही चर्चा झाली आहे. राज्यसभेला ठाकूर यांचा पाठिंबा मिळावा यासाठी सध्या शरद पवारही प्रयत्न करत आहेत. मात्र पवारांच्या फोननंतरही माझा निर्णय 10 तारखेलाच, याच भूमिकेत ठाकूर आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी सध्या जागा सहा आहेत. तर उमेदवार सात झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. शिवसेनेकडून संजय पवार लढत आहेत, तर भाजपकडून धनंजय महाडिक मैदानात आहेत. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे अशा बड्या नेत्यांच्या उपस्थितीत सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. मात्र तरीही मित्र पक्षातील नाराजी अजून दूर होताना दिसत नाही. तर दुसरीकडे अपक्ष आमदारांचा मोठा पाठिंबा हा महाविकास आघाडीला मिळाल्याने आता महाविकास आघाडी थोडा दिलासा मिळाला आहे.
आज शरज पवार आणि हितेंद्र ठाकूर यांच्याच झालेल्या चर्चेनंतर हितेंद्र ठाकूर आघाडीच्या उमेदवारांला मत देण्यास अनुकूल असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र अशी अधिकृत माहिती दोन्ही बाजुंकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आत्ताच या चर्चांबाबत ठोस काही निष्कर्ष काढणं हे घाईचं ठरू शकतं. मात्र ठाकूर यांच्या पक्षाची 3 मतं जोडली गेल्यास महाविकास आघाडीचं मोठं टेन्शन दूर होऊ शकतं. तर दुसरीकडून भाजप नेत्यांनीही ठाकूर यांच्या पाठिंब्यासाठी त्यांचे उंबरे झिझवणे सुरूच ठेवलं आहे. खुद्द धनंजय महाडिक यांनीही जाऊन ठाकूर यांची भेट घेतली आहे. तरीही ठाकूर यांनी मात्र अद्याप अधिकृतरित्या त्यांचे पत्ते अपोन केलेले नाहीत. मात्र हे चित्र आता लवकरच स्पष्ट होईल असंही दिसतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो चारही उमेदवार जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे, तो खरा ठरण्यासाठी अशा छोट्या मित्र पक्षांच्या पाठिंब्याची त्यांना नितांत गरज आहे.