बुलढाणा : राज्यात ३० जून २०२२ ला शिंदे फडणवीस सरकारची स्थापना झाली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन बरेच महिने उलटले असले तरी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा मुहूर्त अद्याप दिसत नाहीय. सरकार स्थापन झाल्यानंतर पुढचे दीड महिने फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोनच नेते सरकार चावलत होते. मंत्रिमंडळाशिवाय ४५ दिवस सरकार चालल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला खरा पण दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला कोणता मुहूर्त सरकारला मिळत नसल्याचे दिसतंय. अशातच राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकर होऊदे आणि त्यात आम्हाला स्थान मिळूदे, अशी इच्छा बाळगणारे नेतेही आशेवर आहेत. असे असताना शिवसेनेच्या खासदाराने मोठा दावा केला आहे. केंद्रात शिवसेनेच्या दोन किंवा तीन खासदारांची केंद्रात मंत्री म्हणून मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर, हे खासदार कोण आहेत ते ठरविण्याचा अधिकार आम्ही सर्वांनी आमचे नेते एकनाथ शिंदे यांना दिला असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.