Kangana Ranaut | कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

| Updated on: Oct 09, 2020 | 9:54 PM

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्यावरुन कंगनाविरोधात न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Kangana Ranaut | कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
Follow us on

बंगळुरु : अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्यावरुन कंगनाविरोधात न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत (Court direct police to register FIR against Actress Kangana Ranaut). कर्नाटकमधील तुमकुरच्या न्यायालयाने क्यथसांद्रा पोलीस स्टेशनला कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ररमेश नाईल एल. यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

कंगनावर केंद्राच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी याचिकाकर्त्यांनी पुरावे म्हणून न्यायालयासमोर कंगनाचे काही ट्विटही सादर केले होते. या याचिकेत कंगनावर इतरही अनेक आरोप करण्यात आले आहेत.

रमेश नाईल एल. यांनी न्यायालयात याचिका दाखल करत कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या याचिकेत म्हटलं होतं, “कंगनाने दंगल होण्यासाठी युवकांशी संबंधित चिथावणीखोर वक्तव्यं केली. त्यामुळे कंगनाविरोधात भारतीय दंड संहिता कलम 153 अ, 504, 108 अंतर्गत गुन्हे दाखल करावेत.” न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या मागण्या मान्य करत पोलिसांना कंगनाविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कंगना रनौत काय म्हणाली होती?

दरम्यान, शेतकरी विरोधी विधेयकाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी करणाऱ्या कंगना रनौतची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील चांगलीच खरडपट्टी काढली होती. “कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही. शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या नट-नटींना शेतकऱ्यांची पोरं सडेतोड उत्तरं देतील,” अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी कंगनाचा समाचार घेतला होता.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी कंगनावर तिखट शब्दांत हल्ला चढवला होता. “पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा असेल या ठिकाणी शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्याला सरकारने मान्य केलेला हमीभाव मिळणं हा शेतकऱ्याचा घटनादत्त हक्क आहे. केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या त्या हक्कावर गदा आली आहे. त्यांच्या आशा आकांक्षांचा चक्काचूर झाला आहे. अशा स्थितीत शेतकरी आपला आक्रोश घेऊन रस्त्यावर उतरत असताना कंगना रनौत सारख्या एका नटवीनं शेतकऱ्याला दहशतवादी म्हणणं याच्यासारखी दुसरी विनोदाची गोष्ट नाही,” असं शेट्टी म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी

शेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना, कंगनाविरोधात तक्रार दाखल

संबंधित व्हिडीओ :

Court direct police to register FIR against Actress Kangana Ranaut