Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: गावगाड्याची सत्ता कुणाच्या हाती?; ठाकरे, पवार, चव्हाण, चंद्रकांतदादा काय म्हणाले?

| Updated on: Jan 18, 2021 | 3:51 PM

राज्याच्या सत्तेचा सोपान समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. (maha vikas aghadi and bjp leaders reaction on Gram Panchayat Election Results)

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: गावगाड्याची सत्ता कुणाच्या हाती?; ठाकरे, पवार, चव्हाण, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Follow us on

मुंबई: राज्याच्या सत्तेचा सोपान समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर भाजपने त्या खालोखाल जागा जिंकून राज्यात आपलंही वर्चस्व कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हांवर लढली जात नसल्याने सर्वच पक्षांनी निवडणुकीत आपलंच वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. आजच्या निवडणूक निकालानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांनी काय दावे केलेत, याचा घेतलेला हा आढावा. (maha vikas aghadi and bjp leaders reaction on Gram Panchayat Election Results)

हा तर जनतेचा आघाडीवर विश्वास: ठाकरे

राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. त्यातून राज्यातील जनतेचा मग ती शहरातील असो वा गावातील, प्रत्येकाचा महाविकास आघाडीवर विश्वास असल्याचं दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीतील आघाडी विषयी विचारले असता त्यावर नंतर बोलू असं सांगून त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.

राज्यात महाविकास आघाडीची चलती: पवार

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पाहता राज्यात महाविकास आघाडीचीच चलती असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. अनेक ठिकाणी निकाल चांगले लागले आहेत. आघाडीतील पक्षाची ताकद ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे, तिथे त्यांचा विजय झाला आहे. या निवडणुका खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या असतात, त्यांनी त्या लढवल्या आणि जिंकले, असंही त्यांनी सांगितलं. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चिन्हावर नसतात. त्यामुळे राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर गेली म्हणणं चुकीचं आहे. सगळीकडे निकाल चांगले लागले आहेत, असंही ते म्हणाले.

राजकीय पक्ष ग्रामपंचायत निवडणूक गांभीर्याने घेत नाही: चव्हाण

ग्रामपंचायत पातळीवर कोणत्याही राजकीय पक्षाने फार मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलंय असं अद्याप घडलेलं नाही. नांदेड जिल्हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसच्या बाजूने निकाल लागेल असं मला वाटतं, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

विरोधकांना मुंगेरी लाल के सपने पडताहेत: देशमुख

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना समन्वय ठेवून काम करत आहे. त्यामुळेच हे निकाल लागले आहेत. विधानसभेतही हेच चित्रं दिसेल, असं सांगतानाच विरोधक गेल्या अनेक वर्षांपासून मुंगेरी लाल के हसीन सपने पाहत आहेत. त्यांनी हे स्वप्न पाहणं सोडून द्यावं, असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे.

 

भाजपने राज्यात दमदार मुसंडी मारली: दानवे

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी भाजपनेच राज्यात दमदार मुसंडी मारल्याचा दावा केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. मागच्या काळात ज्या निवडणूक झाल्या त्यावेळीही ग्रामपंचायतीत भाजप एक नंबरचा पक्ष होता. आता तीन पक्ष एकत्र आल्यानंतर पहिल्यांदा ग्रामीण भागातील निवडणुका झाल्या. त्यामुळे जनमत कुणाच्या बाजूने हे दिसणार आहे. आता भाजपचे सहा हजार उमदेवार निवडून आले असून भाजपच एक नंबरचा पक्ष झाला आहे, असं दानवे यांनी केला.

शिवसेना औषधालाही सापडणार नाही: नाराणय राणे

कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

स्वबळावर लढून पाहाच: चंद्रकांतदादा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या गावातच मोठा झटका बसला आहे. कोल्हापूरमधील खानापूर हे चंद्रकांत पाटलांचं गाव. या गावात भाजपच्या हातून सत्ता गेली आहे. त्यावर पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खानापूरमध्ये सहा पैकी तीन जागा आम्ही जिंकल्या आहेत. दोन जागांवर कमी मताने आम्ही पराभूत झालो आहे. पण तरीही गावाने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असं सांगतानाच एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही. महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आहे, असं पाटील म्हणाले. राज्यात तीन पक्षाचं कडबोळं सत्तेत आहे. मी पहिल्यापासून सांगतो चारही पक्षांनी स्वबळावर लढावं, मग पाहा आम्हीच नंबर वनला असू. राज्यातील आघाडी सरकारला झेंडाही नाही आणि अजेंडाही नाही, अशी टीका त्यांनी केली. ग्रामपंचायतीत निवडून आलो म्हणजे जिंकलो असं होत नाही. त्या ग्रामपंचायतीवर सरपंच निवडून आला तरच ग्रामपंचायत हातात आली असं म्हणता येतं, असं सांगतानाच संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायतीचं चित्रं स्पष्ट होईल. त्यावेळी आमचीच संख्या जास्त असेल, असा दावाही त्यांनी केला.

हा निकाल म्हणजे कृषी कायद्याला समर्थनच: नितेश राणे

सिंधुदुर्गातील आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व पाहता येथील जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत असून शेतकऱ्यांच्या हिताच्या बिलांचे समर्थन जिल्ह्यातील जनता करत आहे हेही दाखवून दिले आहे. तर आता पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही आमचीच सत्ता असणार आहे आणि विरोधक हद्दपार होणार आहेत ही काळ्यादगडावरची रेघ आहे. असं भाजपचे आमदार नितेश राणेंनी यांनी केलं आहे. (maha vikas aghadi and bjp leaders reaction on Gram Panchayat Election Results)

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा

निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
एकूण प्रभाग- 46,921
एकूण जागा- 1,25,709
प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880 (maha vikas aghadi and bjp leaders reaction on Gram Panchayat Election Results)

संबंधित बातम्या:

Kolhapur Gram Panchayat Election Results 2021: प्रकाश आबिटकरांनी करुन दाखवलं, खानापुरात चंद्रकांत पाटलांना हरवलं, सेनेचा झेंडा

ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घौडदौड

Gram Panchayat Election Results 2021: राज ठाकरे म्हणाले ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवा; पण मनसेचं इंजिन धावलंच नाही

(maha vikas aghadi and bjp leaders reaction on Gram Panchayat Election Results)