‘रॉ’चा अनुभव असलेला पोलीस अधिकारी ठाकरे सरकारला कंटाळून केंद्रीय सेवेत; चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

| Updated on: Nov 07, 2020 | 2:50 PM

महाविकासआघाडी सरकारने सुबोध जयस्वाल यांच्या शिफारसी नाकारुन निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करुन घेतले. | Subodh Jaiswal

रॉचा अनुभव असलेला पोलीस अधिकारी ठाकरे सरकारला कंटाळून केंद्रीय सेवेत; चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र
राज्यात माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल
Follow us on

मुंबई: राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीवर आगपाखड केली आहे. महाभकास आघाडीने सर्व धोरणांना बाजूला सारुन राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ही गोष्ट सुबोध जयस्वाल यांना पटली नव्हती. याशिवाय, राज्यातील गेल्या काही महिन्यांतील घटनांमुळे सुबोध कुमार जयस्वाल यांच्या भावनांना मोठा धक्का पोहोचला होता. त्यामुळेच जयस्वाल यांनी राज्य सरकारच्या सेवेतून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. (Subodh Jaiswal takes up central deputation)

चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी ट्विट करुन यासंदर्भात ठाकरे सरकारला लक्ष्य केले. सुबोध कुमार जयस्वाल हे आपल्या पदावरून पायउतार होऊन केंद्रीय सेवेत जाणार आहेत. येणाऱ्या काळात देशाच्या पराक्रमी अशा राष्ट्रीय सुरक्षा बल (एनएसजी) च्या सर्वोच्च पदी विराजमान होण्याची शक्यताही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविली आहे. जयस्वाल यांच्याकडे ‘रॉ’ या गुप्तचर संघटनेतील कामाचा अनुभव होता. त्यांनी 2018मध्ये मुंबईच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. यानंतर त्यांना महासंचालकपदी बढती मिळाली होती.


महाविकासआघाडी सरकारने सुबोध जयस्वाल यांच्या शिफारसी नाकारुन निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करुन घेतले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सुबोध जयस्वाल दुखावले गेले होते. याशिवाय, पोलीस दलाल मजबूत करण्यासाठी जयस्वाल यांनी केलेल्या सूचना आणि उपाययोजनाही ठाकरे सरकारकडून वारंवार धुडकावण्यात आल्या. सरकारच्या या बहिऱ्या आणि कुचकामी कारभाराला कंटाळूनच जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ही गोष्ट राज्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने खूपच घातक आहे. त्यांच्यासारखा सक्षम अधिकारी राज्य सोडून जात आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला.

संबंधित बातम्या:

आधी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची अडीच तास बैठक, मग तासभर मुख्यमंत्र्यांची पोलीस महासंचालकांशी चर्चा

पोलिस दलात मोठे फेरबदल, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

आधी चर्चा, मग बदल्या; ठाकरे-पवार बैठकीत एकमत, 20 मिनिटात काय काय घडलं?

(Subodh Jaiswal takes up central deputation)