
आयपीएलच्या 18 व्या मोसमात साखळी फेरीतील शेवटचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यानंतर क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटरमध्ये कोण खेळणार? हे निश्चित होईल. प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्सने प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. मात्र मुंबईसाठी प्लेऑफआधी चिंताजनक बातमी समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांचं टेन्शन वाढू शकतं. मुंबईसमोर प्लेऑफमध्ये प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करणं आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामागे तसं कारणही आहे.
मुंबईने साखळी फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली. मुंबईने पहिल्या 5 पैकी 4 सामने गमावले. मात्र त्यांनतर जोरदार कमबॅक करत उर्वरित 9 पैकी 7 सामने जिंकले. मात्र साखळी फेरीनंतर मुंबई चौथ्या स्थानी राहिली. मात्र मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचलेल्या उर्वरित 3 संघांविरुद्ध साखळी फेरीत विजय मिळवता आला नाही. मुंबईला साखळी फेरीत गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळरु आणि पंजाब किंग्स विरुद्ध एकही सामना जिंकता आला नव्हता. मुंबईने या 3 संघांविरुद्ध एकूण 4 सामने खेळले. मुंबईचा या चारही सामन्यात पराभव झाला.
गुजरातने 29 मार्च रोजी 18 व्या मोसमातील नवव्या सामन्यात मुंबईवर 36 धावांनी मात केली होती. मुंबईसाठी हा सर्वात मोठा झटका होता. गुजरातचे फलंदाज आणि गोलंदाज या सामन्यात मुंबईवर वरचढ ठरले होते. त्यानंतर 7 एप्रिलला आरसीबीने 20 व्या सामन्यात मुंबईवर 12 धावांनी विजय मिळवला होता. मुंबईने या सामन्यात जोरदार लढा दिला. मात्र शेवटच्या सामन्यात मुंबई अपयशी ठरली. त्यानंतर 6 मे रोजी मुंबई आणि गुजरात दोन्ही संघ या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आले. तेव्हा गुजरातने मुंबईवर 3 विकेट्सने मात केली होती. त्यानंतर आता सोमवारी 26 मे रोजी पंजाबने मुंबईवर 7 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला.
आयपीएल स्पर्धेचा इतिहास मुंबई इंडियन्सच्या विरोधात आहे. मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानी राहिली. मुंबईने पंजाब विरुद्ध विजयी होऊन अंतिम फेरीत 2 वेळा पोहचण्याची संधी गमावली. त्यामुळे आता मुंबईला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी एलिमिनेटर आणि त्यानंतर क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणाऱ्या संघाविरुद्ध खेळावं लागणार आहे. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे मुंबई जेव्हा साखळी फेरीनंतर तिसऱ्या-चौथ्या स्थानी राहिली, तेव्हा अंतिम फेरीत पोहचू शकली नाही. त्यामुळे आकडे आणि इतिहास पाहता मुंबईचं यंदा अंतिम फेरीत पोहचणं अशक्य दिसून येत आहे. मात्र मुंबईने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबई अशा परिस्थितीत आणखी जोराने खेळते. तसेच क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नसतं. त्यामुळे मुंबई यंदा इतिहास बदलणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.