तरुणपणात एक वाकडं पाऊल… म्हतारपणात मिळाली शिक्षा… 85 व्या वर्षी न्यायालयाने ठोठावला तुरुंगवास
Bihar Old Man sentenced by the Court: आयुष्यात केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही. तरुणपणातील एक चूक किती महागात पडू शकते हे या उदाहरणावरून कळेल. एका 85 वर्षाच्या वृद्धाला न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. काय आहे हे प्रकरण?

85 Years Old Man Sentenced for Three Years Prisons: 85 वर्षाच्या या वृद्धाला धडा चालता सुद्धा येत नव्हतं. त्याला दोन माणसांनी धरून आणलं तरी त्याला पाऊल टाकवेना. एका गुन्ह्यात बिहारमधील न्यायालयाने या वृद्धाला सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. वैशाली जिल्ह्यातील न्यायालयाने एका कुटुंबातील 5 सदस्यांना ज्यात एक 85 वर्षांच्या वृद्धाचा पण समावेश आहे, ही शिक्षा ठोठावली. 34 वर्षांपूर्वी एकाची हत्या करण्याच्या प्रयत्नात या सर्वांना तुरुंगावास ठोठावला. दोषींना दंडही भरावा लागणार आहे. हा खटला तीन दशकांपासून सुरू होता. याप्रकरणातील 4 दोषींचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनोज कुमार तिवारी यांनी मंगळवारी याप्रकरणात फैसला सुनावला. 4 दोषींना प्रत्येकी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर वयोवृद्ध 85 वर्षीय दीपा राय यांना 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. अर्थात दीपा राय यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यांचे वय पाहता न्यायालयाने अंतरिम जामीन दिला. न्यायालयाने सर्व पाचही दोषींना, दीपा राय यांच्यासह जगदीश राय, नागदेव राय, नरेश राय आणि नकेश्वर राय यांना प्रत्येकी 25,000 रुपयांचा दंड ठोठावला.
काय आहे प्रकरण?
10 नोव्हेंबर 1992 मध्ये जुरावनपूर गावात ही घटना घडली होती. अदालत राय आणि त्यांची पत्नी हे त्यांच्या घराबाहेर बसलेले होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या घरासमोर काचेचे तुकडे टाकत होते. तेव्हा कोणत्या तरी कारणावरून वाद झाला आणि आरोपींनी अदालत राय आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार केला. त्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गुन्ह्यात एकूण 9 जणांना आरोपी करण्यात आले होते.
#WATCH | Vaishali, Bihar: A court in Bihar had sentenced an 85-year-old man to three years in prison in a 34 years old a case, with four other accused sentenced to 10 years’ imprisonment each and fined Rs 25,000 in a murderous assault case. (02.06) pic.twitter.com/ohmwSIA1Ri
— ANI (@ANI) June 2, 2026
घटनेच्या 6 महिन्यानंतर दोषारोपपत्र दाखल
अतिरिक्त सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मार्च 1993 मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. 17 जून, 1999 आरोपींविरोधात दोष निश्चित झाले. त्यानंतर कोर्टात अनेक दिवस सुनावणी चालली. गुन्ह्यातील पाच दोषींविरोधात खटला चालला. चार जणांचा मृत्यू झाला. तर सर्वात वयोवृद्ध दीपा राय यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.